![alt](http://loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20111224/mv01.jpg)
या चाळीच्या पुनर्विकासाची योजना नियंत्रण नियमावलीमधील कलम ३३ (७) अन्वये राबविण्यात येणार होती. मात्र २००१ मध्ये या योजनेचे परिशिष्ट- दोन (अॅनेक्चर-२) रद्द झाल्यामुळे पालिकेने ही योजनाच रद्द केली. मात्र ओम साईल सॉलिटेर या विकासकाने नगरविकास खात्याकडून नियंत्रण नियमावलीतील कलम ३३(७) ऐवजी ३३ (९) मध्ये ही योजना राबविण्यासाठी परवानगी मिळविली. त्यासाठी १९९४ मध्ये रहिवाशांकडून घेण्यात आलेली संमती पत्रे सादर करण्यात आली. मात्र आपण नव्याने रहिवाशांकडून संमती पत्रे घेतल्याचे विकासकाचे म्हणणे आहे तर विकासकाने आपल्याकडून फक्त कोऱ्या कागदावर सही घेतली होती, असे रहिवाशांनी सांगितले. काही रहिवाशांच्या मागणीवरून मे २००९ मध्ये सहकारमंत्र्यांनी अश्वमेध को-ऑप. सोसायटी रद्द करण्याचे आदेश दिले. या योजनेतील मुख्य प्रवर्तक जून २००९ मध्ये याविरोधात न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या योजनेबाबत सोसायटीने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र असे असतानाही नोव्हेंबर २००९ मध्ये पालिकेने या योजनेला आयओडी दिली. आयओडी मिळताच वास्तुविशारदाने पालिकेकडे पुनर्विकासाचा आराखडा सादर केला आणि त्याला पालिकेने मंजुरीही दिली. पण आमच्याबरोबर कसलाही करार करण्यात आलेला नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. मात्र पालिकेच्या विधी विभागाचे मत घेऊनच आयओडी देण्यात आली आहे, असे विकासकाचे म्हणणे आहे.
न्यायालयाने २०११ मध्ये सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. अलीकडेच या सोसायटीची निवडणूक पार पडली असून जुन्या कार्यकारिणीतील तीन सदस्य, तर विरोधी गटाचे चार सदस्य निवडून आले आहेत. जुन्या कार्यकारिणीने आपल्याला अद्यापही योजनेसंदर्भातील कागदपत्र दिलेले नाहीत, असा आरोप कार्यकारिणीतील चार सदस्यांनी केला आहे. मुख्य प्रवर्तकाकडे कराराच्या प्रती पाठविल्या होत्या. परंतु रहिवाशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, असे विकासकाकडून सांगण्यात आले.
पालिका अधिनियम १८८८ च्या कलम १०५ बी अन्वये नोटीस पाठवून पालिकेने घरे रिकामी करण्याचे आदेश रहिवाशांना दिले. या विरोधात रहिवाशी न्यायालयात गेले. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. या चाळीतील काही बंद घरांचा संक्रमण शिबिरात अंतर्भाव करण्यात आला असून तेथे या रहिवाशांना हलविण्यात आले आहे. एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कापसे यांनी या संक्रमण शिबिराची पाहणी केली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे रिक्त करण्याची कारवाई सुरू केली. त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत. पूर्वकल्पना न देताच अचानक अशी कारवाई करायला नको होती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
संक्रमण शिबिरातील घरांची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे प्रचंड धूळ आहे. त्याच घरात या रहिवाशांचे सामान पालिका कर्मचाऱ्यांनी नेऊन टाकले आहे. या घरांच्या खिडक्यांना दरवाजेच नाहीत. घरांमध्ये घुशींनी बिळे केली आहेत. विद्युतपुरवठा नसल्यामुळे अंधारात दिवस काढण्याची वेळ या रहिवाशांवर आली आहे. पाण्याच्या अपुऱ्या टाक्या, मोजकी शौचालये, मोडकळीस आलेल्या चाळीतील घरांमध्ये आता या रहिवाशांना दिवस कंठावे लागत आहेत. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये संक्रमण शिबिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. रहिवाशांचे विद्युतपुरवठय़ाचे मीटर संक्रमण शिबिरातील घरात बसविण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मीटरमधून या घरांना वीजपुरवठा करीत आहोत, असे विकासकाने सांगितले.
Source :- Click Here
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com